ध्वनीप्रदुषण टाळण्याची जवाबदारी आता शाळा महाविद्यालयाकडे !
By admin | Published: November 10, 2015 09:16 PM2015-11-10T21:16:10+5:302015-11-11T01:12:39+5:30
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे आदेश.
नीलेश शहाकार/बुलडाणा : सण समारंभादरम्यान मोठय़ा आवाजाचे फटाके उडविल्यामुळे मोठय़ा प्रमाणात होणार्या ध्वनी व हवा प्रदुषण होते. पर्यावरणातील प्रदुषण टाळण्याची जवाबदारी आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयांना दिली आहे. यासंदर्भात १0 नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक व शिक्षकांना आदेश देण्यात आला असून त्यांच्याकडून जनजागृती केली जाणार आहे. फटाक्यांचा वापर व परवाना देण्यासंदर्भात काही सूचना देण्यासाबाबत अर्जून गोपाल व सहकार्यांनी केंद्र शासन व यंत्रणा यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने फटाके वापर व जनजागृती संदर्भात आदेश दिले होते. या अनुषंगाने १0 नोव्हेंबर रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हे आदेश दिले आहेत. राज्यातील शिक्षण संस्थाच्या व्यवस्थापक मंडळ व मुख्याध्यापकांनी ध्वनी व हवा प्रदुषणाचे अपायकारक परिणाम शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन जनजागृती करावी. कमी आवाजाचे फटाके वाजविण्यासाठी मतपरिवर्तन करणे, फटाक्याचे आकर्षण कमी करणे तसेच फटाके वापर व हाताळणी संदर्भात असलेल्या कायदेशीर तरतूदीबाबत संबंधीतांकडून विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.