घरगुती वादातून विवाहितेची आत्महत्या
By admin | Published: August 18, 2014 01:33 AM2014-08-18T01:33:47+5:302014-08-18T01:44:55+5:30
अकोला येथील प्रकार, पतीने हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
अकोला : घरगुती वादातून विवाहितेने छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री २.३0 वाजताच्या सुमारास घडली; परंतु विवाहितेच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. विवाहितेच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
गोरक्षण रोडवरील कपिलवस्तूनगरात राहणारी अर्चना प्रफुल्ल पोहरे (३२) हिने घरगुती वादातून शनिवारी रात्री आत्महत्या केली. पतीला रात्री जाग आल्यानंतर त्याला पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानेच तिला खाली उतरविले आणि खदान पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अर्चनाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी रविवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. रविवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास अर्चनाचे वडील हरी सटवाजी कापसे, आई सरस्वतीबाई हे नातेवाईकांसह भोपाळ येथून खदान पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना दोन वर्षांपूर्वी अर्चना हिचा विवाह झाला. तिचा पती प्रफुल्ल मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन होते. यातूनच तो तिचा शारीरिक व मानसिक छळ करायचा. घटनेच्या चार ते पाच दिवसांपूर्वी पती प्रफुल्ल पोहरे याने अर्चनाला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे सरस्वती कापशे या तिला घ्यायला आल्या होत्या; परंतु प्रफुल्लने सासूबाईचे हातपाय जोडून माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही. असे म्हटल्याने अर्चना माहेरी गेली नाही.
अर्चनाने आत्महत्या केली नसून, तिची हत्याच झाल्याचा आरोप अर्चनाचे मामा धर्मा भोनाजी खंडारे यांनी केला आहे.