वान धरणातून अकोल्याला मिळणार ९.५ दलघमी पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:32 AM2017-11-11T01:32:04+5:302017-11-11T01:33:43+5:30

अकोला शहराची लाइफलाइन काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून वान धरणातील ९.५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी दालनात झालेल्या पाणी आरक्षण सभेत पालकमंत्री, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Akola gets 9.5 gallon water from Wan dam | वान धरणातून अकोल्याला मिळणार ९.५ दलघमी पाणी!

वान धरणातून अकोल्याला मिळणार ९.५ दलघमी पाणी!

googlenewsNext
ठळक मुद्देहिवाळी, उन्हाळी पिकांना पाणी नाहीवान प्रकल्पांतर्गत केवळ हरभरा पिकाला मिळणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला शहराची लाइफलाइन काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून वान धरणातील ९.५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी दालनात झालेल्या पाणी आरक्षण सभेत पालकमंत्री, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धरणात पूरक जलसाठा उपलब्ध नसल्याने हिवाळी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणार नाही; पण वान धरणाच्या कक्षेत असलेल्या ३00 ते ४00 हेक्टरवरील हरभरा पिकाला ६.५ दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
यावर्षी पाऊस कमी झाल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात दुष्काळी स्थिती आहे. धरणातही जेमतेम जलसाठा शिल्लक असल्याने या पाण्याचे काटेकोर नियोजन व आरक्षण ठरविण्यासाठी या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात २0१७-१८ मधील पाणी आरक्षणावर सभा घेण्यात आली. सभेला पालकमंत्री  तथा जिल्हा पाणी आरक्षण सतिीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
काटेपूर्णा धरणात आजमितीस १९.५६ टक्के जलसाठा शिल्लक असून, त्यामध्ये ६.५0 दलघमी गाळ तर दरवर्षीप्रमाणे ४.६0 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. म्हणजेच काटेपूर्णा धरणातील ८.५६ टक्केच जलसाठा अकोलेकरांसाठी उपलब्ध आहे. तसेच ४ दलघमी मृत साठा उचलण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.  अकोला शहराची पाण्याची वार्षिक गरज मात्र २0 दशलक्ष घनमीटर आहे. याच अनुषंगाने वान धरणातील पाण्याचे आरक्षण करण्यात आले. वान धरणातूनच अकोट, तेल्हारा, शेगाव, जळगाव जामोद १८0 खेडी तसेच ८४ खेडी पाणी पुरवठा योजनेला पाणी सोडण्यात येते; पण काटेपूर्णा धरणात पाणी नसल्याने यावर्षी काटेपूर्णा धरणाच्या कक्षेतील खारपाणपट्टय़ातील ६४ खेडी पाणी पुरवठा योजनेला वानमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

औद्योगिक वसाहतीला कुंभारी तलावाचे पाणी 
अकोला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत उद्योगासाठी 0.७३ दलघमी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. तथापि, काटेपूर्णा धरणात पाणी नसल्याने पाणी देण्यात येणार नाही. एमआयडीसीतर्फे धरणातून थेट पाणी उचलत असेल, तरच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, अन्यथा कुंभारी लघू प्रकल्पातील पाणीसाठा वापरण्यात यावा, असे आदेश सभेत देण्यात आले.

हरभरा पिकाकरिता ६.५0 दलघमी पाणी
वान धरणातून यावर्षी रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी सोडले जाणार नाही; पण सध्या उभ्या असलेल्या ३00 ते ४00 हेक्टरवरील हरभरा पिकाची स्थिती बघता दोन पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी ६.५0 दलघमी पाणी सोडण्याचे आदेश या सभेत देण्यात आले. दरम्यान, लघू प्रकल्पांमध्ये ९.९0 दलघमी पाणी आहे; पण तेथे कोणतीही पाणी पुरवठा योजना नाही, त्यामुळे उपसाद्वारे सिंचन करण्यास हरकत नसल्याचे सभेत ठरले.

पारस औष्णिक प्रकल्पाला मिळणार निगरुणातून पाणी
पारस औष्णिक वीज कें द्रासाठी मन नदीतून पाणी घेतले जाते. तथापि, पारस बॅरेजमध्ये पाणी कमी असल्याने २0१७-१८ करिता १८.00 दलघमी पाण्याची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने यावर्षी निगरुणा मध्यम प्रकल्पातील १२.४८ दलघमी पाणी व पारस बॅरेजमधील ४.00 दलघमी असे एकूण १६.४८ दलघमी पारस औष्णिक केंद्राला देण्यात येईल, तसेच श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावकरिता १.00 दलघमी पाणी राखीव ठेवण्यात यावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

घुंगशी धरणातील पाण्याबाबत पालकमंत्र्यांच्या सूचना 
घुंगशी बॅरेजमधील पाणी टप्प्या-टप्प्याने सोडून पूर्णा नदीवरील म्हैसांग व इतर कोल्हापुरी बंधार्‍यांमध्ये फळ्या टाकून पाणी अडविण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या. 

मूर्तिजापूरला घुंगशी बॅरेजमधून पाणी!
मूर्तिजापूर शहरासाठी काटेपूर्णा धरणातून २.८३२ दलघमी पाण्याची मागणी करण्यात आली. तथापि, यावर्षी घुंगशी बॅरेज 0.२८४ दलघमी पाणी उचलण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

धरणांमध्ये पूरक जलसाठा उपलब्ध नसल्याने रब्बी व येणार्‍या उन्हाळी पिकांना पाणी मिळणार नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी गहू पिकांची पेरणी करणे टाळावे व पाण्याचे काटेकोर नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.
- जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.
-
 

Web Title: Akola gets 9.5 gallon water from Wan dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.