शूरा आम्ही वंदिले! : रक्षिले स्वातंत्र्य प्राण घेऊनी हाती, गोरख जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:21 AM2018-08-16T11:21:19+5:302018-08-16T11:25:07+5:30

We shouted! : Protected freedom, prognosis, Gorakh Jadhav | शूरा आम्ही वंदिले! : रक्षिले स्वातंत्र्य प्राण घेऊनी हाती, गोरख जाधव

शूरा आम्ही वंदिले! : रक्षिले स्वातंत्र्य प्राण घेऊनी हाती, गोरख जाधव

googlenewsNext
ठळक मुद्देशिपाई गोरख जाधवजन्मतारीख ०१ जून १९६९सैन्यभरती १३ जुलै १९८८ वीरगती २० डिसेंबर १९९३सैन्यसेवा ५ वर्षेवीरमाता अनुसयाबाई जाधव

निमगाव वाघाचा जवान गोरख जाधव नागालँड येथे नक्षलवाद्यांशी झुंजताना शहीद झाला. गोरख यांचे पार्थिव घरी आणण्याची व घरच्या लोकांना तेथे नेण्याची कसलीच व्यवस्था नव्हती. लष्कराने तेथेच गोरख यांचा अंत्यविधी केल्याचे गावातील लोकांना सांगण्यात आले. आई-वडील व गोरखच्या भावांना त्यांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. गोरख यांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी घरात संग्रहालय साकारले आहे. त्या आठवणीवर हे कुटुंब जगत आहे...
शेती व दूध व्यवसायासाठी ओळखले जाणारे नगर तालुक्यातील निमगाव वाघा हे गाव. याच गावातील नाना किसन जाधव हे भाजीपाला घेऊन सकाळीच नगर शहराची वाट धरून प्रपंच चालवणाऱ्यांपैकी एक़ १ जून १९६९ ला नाना व अनुसया यांच्या संसारवेलीवर गोरख यांच्या रुपाने एक फूल उमलले़ गोरख यांचे प्राथमिक शिक्षण निमगावच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. गावात हायस्कूल नव्हतं. त्यामुळे ते हिंगणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत जाऊ लागले. दहावीपर्यंत हिंगणगावला शिकल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी थेट नगर शहर गाठलं. न्यू आर्टस् कॉलेजात त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. पिळदार शरीरयष्टी व अंगात चपळाई होती. फक्त शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा आपली वेगळी वाट निवडायची, असा निर्णय गोरख यांनी घेतला. देशप्रेमाची आवड आणि लष्कराचं आकर्षण असल्याने गोरख यांनी लष्करात जाऊन देशसेवा करावी, असे ठरवलं. त्यामुळे लष्कर भरतीसाठी कष्ट करण्यास त्यांनी सुरूवात केली़ त्यांच्या या प्रयत्नांना १३ जुलै १९८८ ला यश मिळाले. उस्मानाबाद व पुणे येथे झालेल्या भरतीत गोरख निवडले गेले. त्यावेळी त्यांचं वय अवघं १९ वर्षे होतं. भरती झाल्यानंतर त्यांचं प्रशिक्षण थेट बेळगावमध्ये सुरू झालं. कुटुंबीयांची व गावातील सर्वांची भेट घेऊन ते ड्यूटीवर रवाना झाले. लष्करी प्रशिक्षण संपल्यावर त्यांची भारताच्या शांतीसेनेत नेमणूक झाली. शांतीसेनेतील जवान म्हणून त्यांना थेट श्रीलंका येथे पाठवण्यात आलं. ते १६ बटालियनमध्ये मराठा लाईट युनिटमध्ये कार्यरत होते. श्रीलंकेतील काम आटोपल्यावर त्यांना आसाममधील न्यूजलपायगुडी येथे पोस्टिंग मिळाली़ आसाममध्ये उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट, आसाम) या अतिरेकी संघटनेकडून सतत कारवाया होत होत्या़ कधी लष्करावर हल्ले तर कधी स्थानिकांना वेठीस धरले जायचे़ या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी नेमलेल्या टीममध्ये गोरख जाधव यांचा समावेश होता़ तेथे त्यांनी अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले़ त्यामुळे अतिरेकी लष्करावर पाळत ठेवून होते़ दरम्यान पायगुडी येथे चमकदार कामगिरी दाखवल्यानंतर गोरख यांची बदली नागालँडमध्ये झाली़ अप्रतिम सृष्टीसौंदर्य आणि विविध लोककलांची खाण असलेले हे भारतातील राज्य़
नागालँडच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग आणि दक्षिणेला मणिपूर राज्य तर पूर्वेकडे म्यानमार हा देश़ आसाम, मणिपूर या राज्यात उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट, आसाम) या संघटनेकडून अतिरेकी कारवाया होत होत्या़ उल्फा व एनएससीएन (नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड) या नक्षलवादी संघटनांनी हातमिळवणी करुन लष्कराला टार्गेट करण्याचे नियोजन आखले होते़
नागालँड येथे नक्षलवाद्यांनी देशाच्या सुरक्षेला आव्हान दिलं होतं. सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचं काम या नक्षलवाद्यांकडून सुरू होतं. यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली होती. नक्षलवाद्यांच्या अतिरेकी कारवायांना पायबंद घालण्यासाठी लष्कराच्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी अ‍ॅक्टिव्ह करण्यात आल्या होत्या़ अशाच एका २० जणांच्या तुकडीत गोरख यांचा समावेश होता़
२० डिसेंबर १९९३ ला गोरख आपल्या सहकारी जवानांसोबत लष्करी कॅम्पकडे परतत असताना मोकोकचुंग, मरियानी रोड याठिकाणी सकाळी पावणेनऊच्या सुमारास दोन महिन्यांचे विशेष लष्करी ट्रेनिंग पूर्ण करुन तळाकडे परतत होते़ सर्व सैनिक बेसावध असताना एनएससीएन (नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड) या नक्षलवादी संघटनेने हँडगन ए. के. ४७ रायफल्सचा वापर करून गोरख यांच्या साथीदारावर बेछूट गोळीबार केला. नक्षलवाद्यांचा हा हल्ला एवढा भयानक होता की लष्कराच्या तुकडीला प्रतिकार करण्यासही वेळ मिळाला नाही. या हल्ल्यात १ लष्करी अधिकारी व इतर १३ जवानांना वीरमरण प्राप्त झालं. इतर ६ जवान जखमी झाले. जे १३ जवान शहीद झाले, त्यात गोरख नाना जाधव या शूर जवानाचा समावेश होता.
ही दु:खद वार्ता निमगाव वाघा गावात दुसºया दिवशी पोलीस पाटलाच्या घरी फोनद्वारे समजली. पोलीस पाटलाने ही वार्ता गोरख यांच्या घरी येऊन जड अंत:करणाने सांगितली. जाधव कुटुंबाला धक्काच बसला. काय बोलावं?, कुणालाच काही कळेना. खरं तर यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. पण त्याच दिवशी दुपारी तार आली. तार वाचून जाधव परिवारावर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला. गावातील काही जाणकार लोकांनी गोरखच्या युनिटला फोन करून माहिती घेतली. त्यात चौकशी केली असता गोरख यांचा पार्थिव देह घरी आणण्याची व घरच्या लोकांना तेथे नेण्याची कसलीच व्यवस्था नव्हती. लष्कराने तेथेच गोरख यांचा अंत्यविधी केल्याचे गावातील लोकांना सांगण्यात आले. आई-वडील व गोरख यांच्या बंधुंना अंतिम दर्शनही घेता आले नाही. आई, वडिलांना एकदा गोरखला पहायचे होते. पण नियतीने त्यांची ही इच्छाही पूर्ण केली नाही. जाधव कुटुंब या आघाताने पूर्णपणे कोसळले होतं तर गाव सुन्नच झालं होतं. रडून रडून घरच्यांचे डोळे सुकून गेले. सर्वच जण गोरखच्या आठवणीत बुडाले. घटना घडल्यानंतर ५ दिवसांनी गोरखच्या युनिटमधील जवान एक पेटी घेऊन घरी आले. त्यात गोरख यांचा अस्थी कलश होता. तो कलश पाहिल्यानंतर गोरखच्या आईने एकच हंबरडा फोडला. सर्वांनाच दु:ख अनावर झालं. गावातील लोकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. वडील मनात दु:ख साठवून स्तब्ध बसले होते. गोरखची भावंडंही स्तब्ध झाली होती.
गावातील लोकांनी जाधव परिवाराला आधार देत या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घरातील एक गुणवान, कर्तव्यनिष्ठ, अविवाहित मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला होता. आई वडील खचून गेले होते. एकीकडे मुलगा गेल्याचं दु:ख असताना दुसरीकडे आपला मुलगा देशसेवेच्या कामी आल्याचा अभिमान वाटत होता. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी गोरख देशासाठी कामी आले. त्यांचा विवाहदेखील झाला नव्हता. सध्या शहीद गोरख जाधव यांचा मोठा भाऊ मच्छिंद्र एका कंपनीत नोकरी करतात. लहान भाऊ अशोक केंद्र सरकारच्या नोकरीत, तर जालिंदर पेट्रोल पंप चालवितात. आपल्या शहीद भावाचा आदर्श समोर ठेवत गोरख यांच्या परिवाराची वाटचाल सुरू आहे.
गोरख यांच्या वस्तूंचे घरात संग्रहालय
गोरख यांची स्मृती सतत घरात असावी, यासाठी त्यांच्या विविध वस्तूंचे जाधव कुटुंबीयांनी घरातच संग्रहालय तयार केले आहे. गोरख यांच्या कपाटात त्यांनी वापरलेल्या वस्तू त्यांच्या कुटुंबीयांनी जतन केल्या आहेत. यात त्यांचे छायाचित्र, स्पेशल सर्व्हिस मेडल (विथ श्रीलंका), विदेश सेवा मेडल (विथ क्लास्प), बूट, कपडे, टोपी, लष्करी गणवेश, त्यांना मिळालेले प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. यामुळे या वस्तू रूपाने गोरख आपल्या घरातच आहे, अशी भावना कुटुंबीयांची आहे़

शब्दांकन : योगेश गुंड

Web Title: We shouted! : Protected freedom, prognosis, Gorakh Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.