शूरा आम्ही वंदिले! सीमेच्या रक्षणासाठी शत्रूशी झुंज, पुंजाहरी भालेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 04:20 PM2018-08-18T16:20:57+5:302018-08-18T16:24:37+5:30

We shouted! Fighting the enemy to protect the border, Punjhar Bhalerao | शूरा आम्ही वंदिले! सीमेच्या रक्षणासाठी शत्रूशी झुंज, पुंजाहरी भालेराव

शूरा आम्ही वंदिले! सीमेच्या रक्षणासाठी शत्रूशी झुंज, पुंजाहरी भालेराव

Next
ठळक मुद्देशिपाई पुंजाहरी भालेरावजन्मतारीख १ जून १९७७सैन्यभरती २८ मार्च १९९६वीरगती २७ नोव्हेंबर २००१सैन्यसेवा ५ वर्षे ७ महिनेवीरमाता पार्वती चांगदेव भालेराव

पुंजाहरी भालेराव देशसेवा करताना जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. सुरूंगकोट इथं ते देशाच्या सीमेचं रक्षण करीत शत्रूशी निकराने झुंज देत असतानाच आतंकवाद्यांच्या एका तोफगोळ्याने वेध घेतला अन् ऐन तारूण्यात कोपरगावचा हा वीरपुत्र देशाच्या कामी आला.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील ओगदी गावातील चांगदेव व पार्वतीबाई भालेराव या दांपत्याच्या पोटी १ जून १९७७ ला त्यांचा जन्म झाला. पहिली ते दहावी पर्यंतचं त्यांचं शिक्षण हे जवळच असलेल्या करंजी येथील विद्यालयात, व पुढील महाविद्यालयीन शिक्षण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झालं. पुंजाहारी यांनी देशसेवा करण्याची जिद्द उराशी बाळगत तयारी सुरू केली होती.
पुंजाहरी भालेराव वयाच्या १९ व्या वर्षी २८ मार्च १९९६ रोजी भारतीय सेनादलाच्या मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये देशसेवेची शपथ घेऊन भरती झाले. २००१ मध्ये सैन्यदलाने काश्मीरमध्ये आॅपरेशन रक्षक हाती घेतले़ या आॅपरेशनसाठी पुंजाहरी यांची विशेष टीममध्ये निवड झाली़ २७ नोव्हेंबर २००१ सालचा दिवस उजाडला़ अतिरेक्यांकडून भारतीय जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरु झाला़ भारतीय जवानही त्यांच्यावर गोळीबार करत होते़ पण अतिरेक्यांच्या एका गोळीने पुंजाहरी भालेराव यांच्या छातीचा वेध घेतला आणि ते धारातीर्थी पडले. देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. ही वार्ता ऐकताच भालेराव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला़ संपूर्ण कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली. त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी ओगदी इथं आणण्यात आलं. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुंजाहरी यांना देशसेवा करण्याची संधी फक्त पाच वर्षेच मिळाली. भालेराव कुटुंबीयांना पुंजाहरी शहीद झाल्यानंतर सरकारकडून आर्थिक स्वरूपात मदत मिळाली. सध्या आई पार्वताबाई यांना चांगल्याप्रकारे पेन्शन मिळत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व घरदारही चांगलं आहे. पुंजाहरी यांच्या पश्चात आई पार्वतीबाई, बंधू जालिंदर, वहिनी व तीन बहिणी असा परिवार आहे. २००८ मध्ये वडील चांगदेव यांचं निधन झालं. आई पार्वतीबाई यांचं आज ७० वर्षे वय आहे. आपल्या वीरपुत्राचे स्मरण करीत त्या आपलं आयुष्य जगत आहेत. परंतु त्याचबरोबर आपला वीरपुत्र देशासाठी हुतात्मा झाल्याचा अभिमान व गौरव असल्याचं वीरमाता पार्वतीबाई यांनी सांगितलं.

साखरपुडा ठरला अऩ़़्
सप्टेंबर २००१ मध्ये पुंजाहरी भालेराव यांचं लग्न ठरलं होतं. साखरपुडाही झाला होता. लग्नाची तारीख ठरवायचे बाकी होते. ते सुट्टीवर आल्यानंतर लग्नाची तारीख ठरणार होती. त्यासाठी गावाकडं आई, वडील, नातेवाईक त्यांची वाट पहात होते. पण ते येण्याऐवजी शहीद झाल्याची वार्ताच आली. आई, वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. लग्नाआधीच ते देशासाठी हुतात्मा झाले, याची खंत भालेराव कुटुंबीयांना आयुष्यभरासाठी राहिली.

ओगदी येथे स्मारक
शहीद जवान पुंजाहरी यांचं देशासाठीचं बलिदान सर्वांच्या स्मरणात राहण्यासाठी भालेराव कुटुंबीयांनी त्यांच्या मूळगावी ओगदी (ता. कोपरगाव, जि.अहमदनगर) इथं २००५ मध्ये गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी स्मारक उभारलं आहे. हे स्मारक पुंजाहरी यांनी देशासाठी दिलेलं बलिदान आजही सर्वांना स्मरण करून आठवणींना उजाळा देत आहे. शहीद पुंजाहरी यांच्या स्मरणार्थ भालेराव कुटुंबीय व मित्र परिवार क्रिकेटच्या स्पर्धासह विविध शालेय स्तरावरील स्पर्धांचं आयोजन करीत आहेत.

आदरणीय राधाबाईजी़...
आपको २७ राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाईट इन्फन्ट्री) के सभी अधिकारियो सरदार साहेबान एवं जवानो कि औरसे संबोधित करते हुए बहुत प्रसनता हो रही है! आपके पुत्र स्वर्गीय सवार पुंजाहरी चांगदेव भालेराव अदम्य साहस, वीरता और कर्तव्य परायणता का परिचय देते हुए दिनांक २७ नवम्बर २००१ को राष्ट्र की सेवा में वीरगती को प्राप्त हुए ! उनके इस गरीमामय कार्य के लिये युनिट और पुरा देश सदैव उनका ऋणी रहेगा! मैं आपको आश्वासन दिलाता हूँ कि हम सदैव आपके साथ हैं, और आपके परिवार के साथ रहते हुए हमेशा आपकी हर प्रकार कि सहायता करने के लिये तत्पर हंै! यदी आपको कोई भी परेशानी है, तो कृपया अपने घर आये सैनिक के साथ उसे बाटे! हम जल्द से जल्द उसे दूर करनेकी कोशिश करेंगे!
हम आशा करते है कि परम पिता परमात्मा आपपर अपनी कृपा बनाये रखे!’ --अशा आशयाचं पत्र वीरमाता पार्वतीबाई चांगदेव भालेराव यांना सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दरवर्षी येतं.

- शब्दांकन : रोहित टेके

Web Title: We shouted! Fighting the enemy to protect the border, Punjhar Bhalerao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.