नगरमध्ये भाजपाकडून डॉ. सुजय विखे रिंगणात, दिलीप गांधी यांचा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 08:55 PM2019-03-21T20:55:44+5:302019-03-21T20:56:03+5:30

भाजपकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी होणार आहे.

sujay vikhe will contest lok sabha election 2019 | नगरमध्ये भाजपाकडून डॉ. सुजय विखे रिंगणात, दिलीप गांधी यांचा पत्ता कट

नगरमध्ये भाजपाकडून डॉ. सुजय विखे रिंगणात, दिलीप गांधी यांचा पत्ता कट

googlenewsNext

- नवनाथ खराडे

अहमदनगर : भाजपकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी होणार आहे. भाजपाने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकिट कापून डॉ. सुजय विखे यांना मैदानात उतरवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसकरीता न सोडल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपात प्रवेश केला होता. तेव्हाच त्यांची उमेदवारी निशिचत मानली जात होती. त्याचवेळी विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी दिल्ली, मुंबई अशा वा-या करत तिकिट आपल्यालाच असल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचे तिकिट कापण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे डॉ.सुजय विखे विरुध्द संग्राम जगताप असा सामना थेट रंगणार आहे. भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकिट देण्यासाठी पक्षही उत्सुक नव्हता. तर डॉ. सुजय विखे हे गेल्या दोन वर्षापासून लोकसभेसाठी तयारी करत होते. मात्र विखे यांना राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा सोडली नाही. विखे त्यामुळे विखे हे भाजपात गेले. डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करून तिकिट पदरात पाडून घेतील, असा अंदाज बांधला जात होता, अखेर हा अंदाज ठरला. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी भाजपही उत्सुक  नव्हता. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे भाजपनेही उमेदवारांची शोधाशोध सुरु केली होती. खासदार दिलीप गांधी प्रत्येकवेळी लक फॅक्टरवर निवडून आले, ते पहिल्यांदा १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी खासदार झाले. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटीवर लढणारे माजी खासदार दादापाटील शेळके यांना २ लाख ५० हजार ५१ एवढी मते मिळाली. तर काँग्रेसच्या तिकिटावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस रिंगणात होते. त्यांना १ लाख ८८ हजार २५१ मते पडली. तर यावेळी खासदार दिलीप गांधी यांना २ लाख ७८ हजार मते मिळाली. २८ हजार ४५७ मतांनी गांधी विजयी झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढल्याचा फायदा गांधी यांना यावेळी झाला. त्यानंतर २००४ मध्ये खासदार गांधी यांना पक्षाने तिकिट नाकारले. विधानपरिषद सभापती प्रा. ना.स. फरांदे यांना भाजपने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. परंतु प्रा. फरांदे यांना मतदारांनी नाकारले. त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार तुकाराम गडाख खासदार झाले. त्यानंतरील भाजपाच्या केंद्रिय नेतृत्वात बरेच बदल झाले. त्यामुळे २००९ मध्ये खासदार गांधी यांनी पुन्हा तिकिट मिळाले. यावेळीही काँग्रेस-राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार शिवाजी कर्डिले यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले. तर दिवगंत राजीव राजळे हे बंडखोरी करत लोकसभेच्या मैदानात उतरले. या निवडणुकीत कर्डिले यांना २ लाख ६५ हजार ३१६ मते मिळाली. राजीव राजळे यांना १ लाख ५२ हजार ७९५ मते मिळाली. तर गांधी यांना ३ लाख १२ हजार ४७ एवढी मते मिळाली. यावेळी ४६ हजार ७३१ मतांनी गांधी यांनी विजय मिळविला. त्यानंतर २०१४ मध्ये दिलीप गांधी यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजीव राजळे मैदानात होते. मात्र मोदी लाटेत गांधी पुन्हा खासदार झाले.
गेल्या पाच वर्षात गांधी यांच्याविरोधात सर्वसामान्यांची नाराजी वाढली होती, अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्येही मतदारांनी खासदार गांधीना भरसभेत थेट प्रश्न विचारून पेचात पाडले. यावेळी राग अनावर झाल्याने मतदारांवर बरसलेले खासदार गांधी महापालिका निवडणुकीच्या वेळी सर्वांना दिसले. त्यानंतरही असे प्रसंग पाहावयास मिळाले. एकूणच शहरात भाजपाअंतर्गत गटातटाचे राजकारणही आजही मिळत आहे. आगरकर गट आणि गांधी गट आपआपले वेगळे राजकारण करत आहेत. एकमेंकाविरोधात तक्रारी थेट पक्षप्रमुखांकडे करतात. या गटातटाचा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपाला बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अ‍ॅड.अभय आगरकर यांना पराभव स्विकारावा लागला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्षपद खासदार गांधी यांच्याकडे आहे. मात्र त्यांना शहरात पक्षाची ताकद म्हणावी तितकी वाढवता आली नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मोठे अपयश गांधी यांना स्विकारावे लागले. महापालिकेत ६८ नगरसेवक आहेत. त्यामध्ये भाजपाचे फक्त १४ नगरसेवक आहेत. केवळ शिवसेनेला विरोध म्हणून राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याने भाजपचा पहिल्यांदा महापौर झाला. मात्र भाजपाला शहरातील मतदारांनी सपशेल नाकारले. याचवेळी खासदार गांधी याचे पुत्र सुवेंद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांनाही पराभव स्विकारावा लागला. हा गांधी यांना सर्वात मोठा धक्का होता. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतफक्त १४ जागांवर विजय मिळविता आला. याशिवाय भाजपने केलेल्या तब्बल तीन सर्व्हेमध्ये ६० टक्के लोकांनी खासदार गांधी यांच्यावर नाराज असल्याचे पुढे आले. पालकमंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपकडून सर्व्हेमध्ये पसंती दर्शवली. मात्र यापैकी भानुदास बेरड वगळता कोणीही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक नव्हते. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार पक्षपातळीवर झाला. त्यामुळे भाजप नवीन उमेदवारांची शोधाशोध केली. त्यातच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याच मुलाने भाजपात प्रवेश केल्याने उमेदवाची शोधाशोध थांबली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशही झाला. आणि आज तिकिटावर दिल्लीतून शिक्कामोतर्ब झाले,

आमदार कर्डिले यांची भविष्यवाणी खरी ठरेल काय 
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी डॉ.विखे यांना अनेकवेळा भाजपमध्ये येण्याची खुली आॅफर दिली होती. अखेर ते भाजपमध्ये दाखलही झाले, आता तिकिटही मिळाले आहे. विखे यांच्याविरोधात आमदार कर्डिले यांचे जावई संग्राम जगताप राष्ट्रवादीकडून लढत आहेत. त्यामुळे ‘विखे हे भाजपकडूनच खासदार होतील’, ही आमदार कर्डिले यांची भविष्यवाणी खरी ठरेल काय? याचे उत्तर मतमोजणीनंतरच मिळणार आहे.

Web Title: sujay vikhe will contest lok sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.