कुकडीच्या आवर्तनावर दोन दिवसात अंतिम निर्णय
By admin | Published: July 2, 2014 12:37 AM2014-07-02T00:37:37+5:302014-07-02T00:37:37+5:30
श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनासंदर्भात पुणे व नाशिक आयुक्तांचा दोन दिवसात अहवाल मागवून घेऊन कुकडीचे पिण्यासाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.
श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनासंदर्भात पुणे व नाशिक आयुक्तांचा दोन दिवसात अहवाल मागवून घेऊन कुकडीचे पिण्यासाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.
मंगळवारी दुपारी ३ वाजता मंत्रालयात जलसंपदामंत्री शशीकांत शिंदे यांचे अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीस आ. बबनराव पाचपुते, आ. वल्लभ बेनके, आ. शामल बागल, माजी आमदार शिवाजीराव नागवडे, राजेंद्र म्हस्के, सदाअण्णा पाचपुते, अॅड.विठ्ठलराव काकडे, लक्ष्मण नलगे, ज्ञानदेव मोटे, भूषण बडवे तसेच नगर सोलापूरचे जिल्हाधिकारी, कुकडीचे अधिकारी उपस्थित होते. कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी भूमिका आ.बबनराव पाचपुते व शिवाजीराव नागवडे यांनी मांडली. त्यावर ना.शशिकांत शिंदे यांनी पाणी साठ्याची माहिती घेतली. धरणातील पाणी साठा आयुक्तांच्या ताब्यात आहे. पुणे व नाशिक आयुक्तांचा अहवाल येताच पिण्यासाठी आवर्तन सोडण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले. पिंपळगाव जोगे, वडज, डिंबे धरणातील अडीच टीएमसी पाणी येडगावमध्ये सोडल्यानंतर येडगावमधून पिण्यासाठी पाणी सोडणार आहे.
पाण्याचे योग्य नियोजन
कालवा सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत कुकडीचे तीन आर्वन सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तीन आवर्तने सोडली. पाऊस लांबला म्हणून अडचणी निर्माण झाल्या. १७ जून रोजी दिलेल्या पत्रानुसार कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. पिण्यासाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीगोंदा तालुक्यात ३२ लाख, आंबेगाव ४ लाख, शिरूर २२ लाख, कर्जत ४ लाख, पारनेर दोन लाख मे. टन ऊस उभा आहे. श्रीगोंद्याचे वाळवंट झाले असतेतर ३२ लाख मे. टन ऊस उभा राहिला असता का?
- बबनराव पाचपुते, आमदार
कुकडी पाणीप्रश्नी मुख्यमंत्री झाले गंभीर
श्रीगोंदा : कुकडी पाणी प्रश्नावरील ज्वलंत समस्या माजी आमदार शिवाजीराव नागवडे, कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप व राजेंद्र म्हस्के यांनी मांडल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गंभीर झाले. कुकडीचे पिण्यासाठी तातडीने आवर्तन सोडू आणि हा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्यासाठी खास बैठक घेऊ सांगत मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतली.
शिवाजीराव नागवडे, राहुल जगताप, राजेंद्र म्हस्के, संभाजी देवीकर, भूषण बडवे, ज्ञानदेव मोटे, बंडू धारकर यांनी कुकडी पाीण प्रश्नी मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर भेट घेतली. शिवाजीराव नागवडे म्हणाले, पुण्यावाले कुकडीचे वारेमाप पाणी वापरतात त्यामुळे नगर जिल्ह्यावर अन्याय होतो. राजेंद्र म्हस्के म्हणाले, माणिकडोह धरणात ३ टीएमसी पाणी वाढविण्यासाठी डिंबे-माणिकडोह बोगदा करण्याची गरज आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, आपण लवकरच कुकडीच्या पाणी प्रश्नी विशेष बैठक लावू आणि शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेऊ. (तालुका प्रतिनिधी)