दरोडेखोरांच्या गोळीबारात सराफाचा मृत्यू, लाखोंचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 11:07 PM2018-08-19T23:07:35+5:302018-08-19T23:08:25+5:30
तालुक्यातील कोळपेवाडी येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर सात ते आठ जणांनी दरोडा टाकून दोघा सराफांवर गोळीबार केला़ या हल्ल्यात दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे (वय ३६) यांचा मृत्यू झाला
कोळपेवाडी/कोपरगाव (जि.अहमदनगर) : तालुक्यातील कोळपेवाडी येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर सात ते आठ जणांनी दरोडा टाकून दोघा सराफांवर गोळीबार केला़ या हल्ल्यात दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे (वय ३६) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे बंधू गणेश सुभाष घाडगे (वय ४२) हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील लाखो रुपयांचे सोने, चांदीचे दागिने लुटून नेले़ रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे़
कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते़ रविवारी कोळपेवाडी येथील आठवडे बाजार असल्याने दुकान परिसरात गर्दी होती. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकानात शाम व त्यांचे बंधू गणेश बसलेले होते़ याचवेळी सात ते आठ दरोडेखोरांनी अचानक दुकानात प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी पिस्तुलातून शाम व गणेश यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत शाम यांचा मृत्यू झाला तर गणेश हे गंभीर जखमी झाले. गणेश यांच्यावर प्रथम कोपरगाव येथील रूग्णालयात उपचार करून त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन बंदुकीतून झाडलेल्या फैरीचे काडतुसे जप्त केली आहेत. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, मयत घाडगे यांच्या मृतदेहाचे कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू होते. यावेळी रूग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती़ घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेनंतर रात्री ९ वाजता शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली़
२००६ च्या घटनेची आठवण
२००६ मध्ये कोपरगाव शहरातील बाजारतळ परिसरात भरदिवसा एकाचवेळी तीन सराफांच्या दुकानावर दरोडेखोरांनी दगडफेक करीत दहा ते पंधरा लाख रूपयांचा ऐवज लुटून नेला होता, अशीच घटना कोळपेवाडी येथे घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.