नगरमध्ये युती की घोडेबाजार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:01 AM2018-12-11T02:01:14+5:302018-12-11T06:48:58+5:30

महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे.

Alliance of horse trading in the city? | नगरमध्ये युती की घोडेबाजार?

नगरमध्ये युती की घोडेबाजार?

Next

- सुधीर लंके 

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे. युतीतील भांडणाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस उठविण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. काँग्रेस व छोट्या पक्षांनाही प्रचंड महत्त्व आले आहे.

महापालिकेत ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. शिवसेना (२४) व भाजपा (१४) एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ ३८ वर पोहोचून त्यांची सहजासहजी सत्ता स्थापन होऊ शकते. मात्र, सेना-भाजपामध्ये येथे विस्तवही जात नाही. सेनेचे नेते माजी आमदार अनिल राठोड व भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. राठोड यांना शहरात ‘भैय्या’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी नगरच्या दहशतीचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला असून प्रत्येक निवडणुकीत ते ‘भयमुक्त नगर’ ही घोषणा देतात. गांधी यांनी त्यांच्यावर टीका करताना ‘नगर शहर भयमुक्त करण्यापेक्षा भैयामुक्त करावयाचे आहे’ असे विधान निवडणुकीत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘भयमुक्तीची घोषणा करणाऱ्यांचेच या शहराला भय असून त्यांनाही आम्ही आत घालू शकतो’ असा इशारा प्रचार सभेत दिला होता. त्यामुळे राठोड हे भाजपाला सहजासहजी सोबत घेतील अशी परिस्थिती नाही. निकालानंतर प्रतिक्रिया देताना देखील राठोड, गांधी यांनी एकमेकावर टीका केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यासच स्थानिक नेते एकत्र येऊ शकतात.

राष्ट्रवादी (१८) व काँग्रेस (५) मिळून ही आघाडी २३ जागांवर पोहोचते. त्यांना बहुमतासाठी १२ जागा कमी पडतात. बसपाचे चार, अपक्ष दोन व समाजवादी पक्षाच्या एका उमेदवाराने त्यांना साथ दिली तरी त्यांचे संख्याबळ ३० च्या पुढे जात नाही. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करावयाची असल्यास सेना, भाजपापैकी कुणाचीतरी साथ घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात शहरात तात्विक मतभेद असून शिवसेनेने राष्टÑवादीला आजवर उघड साथ केलेली नाही. सेनेने सातत्याने राष्ट्रवादीवर आरोप केलेले असल्याने या दोघांनी एकमेकांसोबत जाणे हे विरोधाभास दर्शविणारे ठरेल. हे दोन्ही पक्ष एकमेकाची छुपी साथ करतात मात्र, उघडपणे एकमेकांची साथ करतील का?, ही शंका आहे.

पक्षीय बलाबल
पक्ष                  २०१३      २०१८
शिवसेना            १७          २४
भाजपा               ०९          १४
राष्ट्रवादी             १८          १८
काँग्रेस               ११           ०५
मनसे                ०४           ००
बसपा               ००           ०४
समाजवादी       ००           ०१
अपक्ष               ०९           ०२

शिवसेना-काँग्रेस एकत्र येणार?
नगर शहरात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे सध्या काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत.
राष्ट्रवादीला दूर ठेवत काँग्रेसने सेनेसोबत हातमिळवणी केली व इतर छोट्या पक्षांना त्यांनी सोबत घेतले तर त्यातूनही बहुमत साकारु शकते.
विखे हे फोडाफोडीचे राजकारण करु शकतात. त्यामुळे काँग्रेस व छोट्या पक्षांच्या हातीही सत्तेच्या चाव्या आहेत.

Web Title: Alliance of horse trading in the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.