आयकर विभागात ३५ कोटींची तूट
By Admin | Published: September 23, 2014 01:11 AM2014-09-23T01:11:20+5:302014-09-23T01:37:30+5:30
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील बड्या उद्योगपतींनी आयकर शुल्क थकविल्याने चालू आर्थिक वर्षात नगर विभागात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३५ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे़
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील बड्या उद्योगपतींनी आयकर शुल्क थकविल्याने चालू आर्थिक वर्षात नगर विभागात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३५ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे़ एक महिन्याच्या आत करदात्यांनी विभागाकडे कर भरावा अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा संयुक्त आयकर आयुक्त शिवराज देशमुख यांनी दिला आहे़
२०१३-१४ या आर्थिक वर्षात १०८ कोटी ७० लाख ९४ हजार रुपयांचा आयकर भरणा झाला होता़ २०१४-१५ या आर्थिक वर्षात मात्र, ७३ कोटी १५ लाख २३ हजार रुपयांचाच कर मिळाला़ त्यामुळे ३५ कोटींची तूट निर्माण झाली आहे़ करदात्यांनी लवकरात लवकर कर भरावा, यासाठी आयकर आयुक्त शिवराज देशमुख यांनी सोमवारी शहरातील उद्योजक, ज्वेलरी, मेडिकल व ठेकेदार प्रतिनिधींची बैठक घेवून चर्चा केली़ येत्या एक महिन्यात थकीत कर भरावा, अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा यावेळी देशमुख यांनी दिला़ चालू आर्थिक वर्षाचा दि़ १५ सप्टेंबरपर्यंत कर भरण्याची मुदत होती़ मात्र, बड्या उद्योगपतींनी याकडे दुर्लक्ष केले़ तर अनेक करदात्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन दाखवून करातून सुटका करण्याचा प्रयत्न केला़ मागील वर्षीच्या तुलनेत आयकर कमी का झाला, आधी कोणी किती कर भरला होता़ याची दि़ ३० सप्टेंबर पर्यंत आयकर विभागाने करदात्यांकडे कारणे मागितली आहेत़
(प्रतिनिधी)