योगी पावन मनाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:04 PM2018-11-21T14:04:22+5:302018-11-21T14:04:30+5:30

योग म्हटले कि आता कोणाला जास्त सांगावे लागत नाही कारण आता तुम्ही कोणालाही विचारा तुम्ही सकाळी व्यायाम वगैरे काही करता कि नाही ?

Yogi is pure mind | योगी पावन मनाचा

योगी पावन मनाचा

googlenewsNext

योग म्हटले कि आता कोणाला जास्त सांगावे लागत नाही कारण आता तुम्ही कोणालाही विचारा तुम्ही सकाळी व्यायाम वगैरे काही करता कि नाही ? तो लगेच उत्तर येते, अहो मी दररोज सकाळी साडेपाच वाजता योगा न चुकता करतो. सकाळी टीव्ही चे कोणतेही चॅनेल लावा. तुम्हाला त्यामध्ये तरुण तरुणी योगा करतांना दिसतील. योगाभ्यासावरिल अनंत ग्रंथ संपदा, वेगवेगळी व्याख्याने, विशेष म्हणजे आता जगभर योगा सुरु आहे आणि २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस सुद्धा मनाला जातो. हे सर्व खूप चांगलेच आहे यात शंका नाही पण योगाचा खरा अर्थ कळणे एवढे सोपे नाही. खरा अर्थ आणखी वेगळा आहे. योग या शब्द्राची उत्पती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे.'युज' या धातूचा मूळ अर्थ जोडणं, संबंध प्रस्थापित करणं असा आहे. जो जोडतो किंवा संबंध प्रस्थापित करतो तो योग. महर्षी पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रात सांगितले आहे. योगसचित्तवृत्ती निरोध:। चित्तवृत्तींचा निरोध किंवा संयम म्हणजे योग. अर्थात सर्व क्षेत्रात एकाग्रता असल्याशिवाय ध्येय प्राप्त करता येत नाही त्यासाठी योग आवश्यक आहे.
आपल्या महाराष्ट्रातील सर्वविदित असलेले संत म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांची तीन भावंडे यांनी वारकरी संप्रदायात मोठे योगदान दिलेले आहे. एकदा श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये माधुकरी मागण्यासाठी गेले होते, त्यांना ब्रहमवृंदांनी वाळीत टाकलेले होते. संन्याशाची संतती म्हणून त्यांना हिणवले जात होते, उपेक्षा होत होती. माधुकरी सुद्धा व्यवस्थित देत नव्हते. असेच आळंदीतील एका ब्रह्मवृंदाने त्यांना माधुकरी न देता वाक्ताडन केले आणि शिवाय त्यांना एक चापट मारली. माउलींना फार वाईट वाटले. आपण असे या जगाचे काय केले? कि ज्यामुळे हे लोक आपली अशी उपेक्षा करतात, छळ करतात, वाळीत टाकतात. एवढ्यावर भागत नाही म्हणून कि काय शरीराला आघात सुद्धा करतात. मित्रांनो! माउली त्यांना शाप देऊ शकत होते पण! त्यांनी तसे काहीही न करता सिद्ध बेटात आले व झोपडीमध्ये जाऊन ताटी (दरवाजा) लावून घेतला व आत्मक्लेश करीत बसले. पश्चाताप झाला, डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जग दुतोंडी सावज । सापडे तिकडे सहज धरी ।। जग म्हणजे मांडुळासारखे आहे दोन तोंडाचे. मुक्ताबाई सर्वात लहान साधारण १३-१४ वर्षाच्या. त्या इंद्रायणीवरून आल्या आणि बघितले तो काय माउली ताटी बंद करून बसले आहेत. त्यांनी श्री निवृत्तीनाथ महाराजांना विचारले कि, माउली असे का ताटी बंद करून बसले आहेत? दादांनी सर्व हकीगत सांगितली, मुक्ताबाईंचा अधिकार फार मोठा होता. त्या वयाने जरी सर्वात लहान होत्या. तरी अधिकाराने महान होत्या. चांगदेवासारखा १४०० वर्षे योगाच्या जोरावर जगलेल्या योग्याच्या त्या गुरु होत्या. कीर्तनकारात प्रसिद्ध असलेले सगुण भक्त श्री नामदेव महाराज यांना सुद्धा मुक्ताबाई म्हणाल्या होत्या. झालासी हरिभक्त तरी आम्हा काय? आंतुली ती सोय न ठाउकी।। घेउनि टाळदिंडी हरिकथा करिसी। हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे।। गुरुवीण तुज नव्हेचि गा मोक्ष। होशील मुमुक्षु साधक तूं। तुझ रुप तुवां नाही ओळखिलें। अहंतेतें धरिले कासयासी अशा प्रकारे कानउघडणी केल्यावर त्याच श्री नामदेवरायांनी विसोबा खेचरांना गुरु केले होते. आणि माउली तर ज्ञानियांचा राजे होते, योगियांचा शिरोमणी होते पण या लडिवाळ मुक्ताईने त्यांनाच प्रेमाने आणि धाकटेपणाच्या अधिकाराने उपदेश केला. त्या ताटीजवळ गेल्या आणि त्यांनी सुंदर अभंग रचना करून गाऊ लागल्या त्या अभंगांनाच ताटीचे अभंग म्हणतात, योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥१।। विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥२।। शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥३।। विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४।।
योगाची इतकी सुंदर व्याख्या महर्षी पंतंजलींनीही केली नाही. त्या म्हणतात माउली ! तुम्ही योगियांचे महान योगीराज आहेत पण मी आज तुम्हाला योगी म्हणजे काय हे सांगते. अहो माउली ! योगी त्याला म्हणतात ज्याचे मन पावन झाले आहे, पवित्र झाले आहे, व्यापक झाले आहे. त्यालाच योगी म्हणतात. तो योगी जगाचे अपराध सहन करतो. अहो ! जगाचा स्वभाव आहे दुटप्पी वागणे, काम क्रोधादिक तर जगाचा स्थायीभाव आहे ते सोडणार नाहीत पण ! विश्व् रागाने जरी अग्नी झाले तरी संतांनी पाणी व्हावे व जगाच्या क्रोधाला शांत करावे आपण पश्चाताप न करता शीतलता धारण करावी. जग कधी चांगले बोलेल कधी वाईट बोलेल त्यामुळे आपल्या मनाला क्लेश, दु:ख होईल पण आपण वाईट न वाटून घेता आपण तो आपल्याला उपदेश समजावा. म्हणजे मग आपल्याला खेद होत नाही. अहो माउली ! तुम्हीच सांगता ना, हे विश्वची माझे घर । ऐसी मती जायची स्थिर । किंबहुना चराचर । आपणचि जाहला ।। परमात्मा विश्वव्यापक आहे व तो एकच आहे, विश्व हे एखाद्या पटासारखे आहे व ब्रह्म हे दोरा आहे, एका दो-यानेच मोठा पट (वस्त्र) होत असतो म्हणजे तो परमात्माच सर्वत्र असतो. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे । असे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज एका पदात म्हणतात. त्यामुळे तुम्हाला खेद करायचे कोणतेही कारण नाही.
ज्याचा सुखसागरात वास झाला आहे. त्याला उच-नीच भेद राहत नाही. हा एखाद्या नाटकासारखा खेळ आहे. हा खेळ स्थिर राहत नाही. आशा, दंभ आवरा, मिथ्या, कल्पना आवरा, तुम्ही एक साधू झाले आणि बाकीचे काय वाया गेले? काम, क्रोध सारून टाका व ताटी उघडा, खरे म्हणजे ती ताटी बाहेरची नसून अंत:करणाचीच आहे. अहो क्रोध तरी कोणावर करावा? आपणच सर्वत्र आहोत. स्वस्कंधरोहण न्यायाने तुम्हाला कोणाचाही राग धरता येणार नाही. मी तुमची धाकटी बहीण आहे व लडिवाळ आहे म्हणून मी तुम्हाला प्रेमाने बोलते आहे ब्रह्म सत्य जगन्मिथ्या, जीवो. ब्रहमैव नापर: या सिध्दांताप्रमाणे काहीही वाया गेले नाही. जीवरूपी मुद्दल व्यवस्थित आहे त्यात तोटा झाला नाह.
या ताटीच्या अभंगावरून एक लक्षात येते कि योगी त्यालाच म्हणतात कि त्याचे अंत:कारण स्वच्छ , पवित्रा, दयाळू, आहे. उगीच जटा, नखे वाढवून शापवाणी उच्चारून लोकांवर क्रोध करणारा योगी असूच शकत नाही, तो योगी नसून दांभिक असतो. ते लोक व्यर्थ वाणी शिणवितात. खरा योगी, खरा साधू कोणाला म्हणावे याच्या सुंदर व्याख्या आमच्या मुक्ताईने ज्ञानेश्वर माऊलीच्या निमित्ताने केल्या आहेत. अवघ्या विश्वाला उपदेश केला आहे.

भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पा.) ता. नगर.
मोबाईल ९४२२२२०६०३

Web Title: Yogi is pure mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.