‘तुकोबांचा लोकधर्म आणि तुकोबांचा देव..’  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:24 PM2019-03-22T15:24:48+5:302019-03-22T15:25:52+5:30

तुकोबा हे वैदिक परंपरा उध्वस्त करायला निघालेले कोणी पुरोगामी वगैरे नव्हते तर सद्धर्माची पुन्हा स्थापना करणारे व्रती वैष्णव होते...  

Why Sant Tukaram Maharaj Is One Of the Greatest Sant In Maharashtra? | ‘तुकोबांचा लोकधर्म आणि तुकोबांचा देव..’  

‘तुकोबांचा लोकधर्म आणि तुकोबांचा देव..’  

googlenewsNext

- रामभाऊ डिंबळे-  
    
मध्ययुगातील भक्तिसंप्रदायात तुकोबारायांची अनन्यभक्ती ही विलक्षण उठून दिसते. पंढरीच्या पांडुरंगाशी तुकोबांचे नाते अगदी वेगळ्याच प्रकारचे होते. परमेश्वराकडे जिव्हाळ्याने आणि आदराने पाहणारे अनेक संत दिसतात, पण तुकोबांचा देव इतका जवळचा आहे की ते नि:शंकपणे त्याच्याशी बोलतात, भांडतात, जणू हक्क सांगतात.  देवाशी तुकोबांचे सख्य हे आदर, विश्वासाच्याही खूप पलिकडे गेलेले दिसते. हे अखंड अनन्य नाते जेथे जातो तेथे तू माझा सांगाती या शब्दांनी ते व्यक्त करतात. हा देव नव्हे संकुचित कारण तो नाम्यासवे जेवी  या देवालासुध्दा धर्म रक्षणासाठी मानवापोटी जन्म घेणे, अवतार घेणे भाग पाडले आहे. तू सर्वांची माऊलीही आहेस आणि सावलीही आहेस या परमेश्र्वराकडे असे दुजे नाही कोठे . आणि हा देव जन वनी भेटतो. हा देव तुमचे वेगळेपण उरूच देत नाही, तुमचे वाटोळे करतो.  असा अद्वैताचा अनुभव देणारा तो जनार्दन आहे. 
असा तुकोबांचा देव हा भक्तांचा सखा आहे. अशा भक्त भक्तातही असाच एकजीवपणा आहे. म्हणजे तुकोबांचा पांडुरंग सगळ्यांना जोडणारा आनंदकंद असाच आहे.  तुकोबांच्या सुमारे ४५०० प्रमाणे अभंगातील सुमारे १५०० अभंग हे त्या पांडुरंगाचे वर्णन करणारे आणि त्याची आळवणी करणारे असेच आहेत.  तुकोबांच्या तथाकथित हीन जातीचा अडसर या ऐक्याच्या आड आलेला कोठेही दिसत नाही. 
............     
तुकोबा म्हणतात की यातायातिधर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री म्हणजे वेदशास्त्रांचा हवाला देऊन ते निश्चयाने म्हणतात की या वैष्णव धर्मात जातीचा विचार अगदीच गैर लागू आहे.त्यासाठी ते म्हणतात तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ चोखामेळा, बंका असा जातीचा महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करीे तुकोबांचा हा विश्वास भगवद्गीतेतील स्त्रियो वैश्या: तथा शूद्रा; तेरपि यान्ति परांगतिम्या भगवत वचनाचाच साक्षात अनुवाद आहे. अंत्यजादि योनि तरल्या हरिभजने असा निर्वाळा देत ते म्हणतात की वर्ण अभिमाने कोण जाहले पावन ? पोकळ अभिमानाने कुणीच अधिक सोवळा किंवा पावन ठरत नाही. एकदा तुम्ही हरीचे दास झालात की मग पवित्र ते कूळ पावन तो देश असे तुमचे कूळ शुद्धच गणले जाते.  या विष्णुमय जगात असे वाटले विभाग हा केवळ त्याचा खेळ आहे.  कारण अवघे एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्नभिन्न.तुकोबांच्या लेखी भेदाभेद भ्रम अमंगळ असेच होते.  वेदपुरुष नारायणानेच असा निर्वाळा केल्याचा दाखला ते देतात.

* तुकोबांची जडणघडण

चारशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात चातुर्वण्याचा आणि जातीपातींच्या उतरंडीचा पगडा समाजावर होता हे वास्तव असले तरी ही व्यवस्था टोकाची जखडबंद नव्हती. एरवी तुकोबांसारखा शूद्र योनी मधला माणूस वेदांत वाचू शकला नसता. संस्कृतवचनांचा अर्थ अभ्यासूच शकला नसता.त्यादृष्टीने तुकोबांची जडणघडण समजून घेणे महत्वाचे आहे. तुकोबा वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा असे अधिकारवाणीने सांगू शकले आणि घनपाठी,जटापाठी वैदिकांना तुम्ही माथ्यावर भार वाहणारे पण डोक्यात अर्थाचा प्रकाश न पडलेले मजूरच ठरता असे सांगू शकले. ऋषी ते बोलले ते आचरणात आणणारे वैदिक आम्ही आहोत  असे सांगणारे तुकोबा हे वैदिक परंपरा उध्वस्त करायला निघालेले कोणी पुरोगामी वगैरे नव्हते तर सद्धर्माची पुन्हा स्थापना करणारे व्रती वैष्णव होते.  त्यासाठी त्यांनी विरोधाभासांचे खंडण केले, दंभावर आघात केले, प्रस्थापित चौकटींचा पोकळपणा दाखवून दिला, आणि अनेकांचा रोष ओढवून घेतला.  तरी त्याहूनही अधिक मोठ्या प्रमाणात लोकांचा आदर संपादन केला.
    असा सश्रद्ध स्पष्टवक्ता आपोआप जन्माला येत नाही. दुष्काळ, पारतंत्र्य, आर्थिक आघातांचे टक्केटोणपे खात, वैराग्य, आणि भक्तीच्या जोरावर आपल्या आंतरिक ऊर्जेच्या बळावर तुकोबा जगद्गुरू पदावर पोहचले.

कित्येक पुरोगामी म्हणवणाºया मंडळीना वाटते तुकोबांना घातपात झाला असला पाहिजे. एकांती रममाण होण्याची, जनातून मागे सरून वनात आश्रय घेण्याची वानप्रस्थ परंपरा या तथाकथित आधुनिकांनी समजूच शकत नाही. तुकोबांंनी धर्मसंस्थापना करताना अनेकांचे दंभ उघडकीस आणून मोठे शुद्धिकार्य केले. त्यासाठी मंबाजी सारख्यांचे वैरही पत्करले याचा अर्थ या वैराची परिणती घातपातापर्यंत होईल असा घेणे म्हणजे आजच्या युगातील जातीव्देषाचे आरोपण पूर्वकालीन घटनांवर केल्यासारखे होईल. तुकोबांनी ज्या पोकळ कर्मकांडांवर टीका केली त्याचे अभिमानी त्यांना शक्य असलेल्या बहिष्कारादी प्रतिकारापर्यंत गेले हे खरेच.  

* तुकोबांचा प्रांजळ विनय 
एवढा अधिकारी पुरुष, पण स्वत:विषयी कोणताही अहंकार वा अभिनिवेश नाही अशी तुकोबांची वृती होती.  जगाच्या दंभावर त्यांनी जेवढे आसूड ओढले त्याहून अधिक ते स्वत:बाबत परखड आत्म टीका करीत.  घोकाया अक्षर मज नाही अधिकार शिवाय नाही ऐशी मति, अर्थ कळे असे म्हणणारे तुकोबा सुटायासी काही पाहतो उपायह्ण असा प्रयत्नवाद सांगतात.  माझ्या हातून पैशांच्या गवार्ने काही महादोष घडले असे कबूल करतात.  बळे बाह्याात्कारे संवादिले सोंग, नाही झाला त्याग अंतरीचाह्ण असे आपल्या अवस्थेचे गुह्य सांगतात. शिवाय म्हणतात की माझे जाणते मीपण जाळून टाकायला हवे कारण त्यानेच माझा खून मांडियेला..    इतक्या कठोरपणे आत्मपरीक्षण करणारा साधक क्वचितच आपल्याला भेटतो.  त्यांच्या या प्रांजळ, पारदर्शक नम्रतेमुळेच तुकोबा सर्व वर्णांच्या भक्तांना आपलेसे  वाटत असतात.  

तुकोबांचा परखड उपदेश 
तुकोबांनी स्वत:कडे कठोरपणे पाहिले तसेच जनरीतीचेही कठोर परीक्षण केले.  आवश्यक तेथे अत्यंत निर्भीडपणे त्यांनी सत्य प्रतिपादिले.  त्यांचा उपदेश नुसता भावुक नसे. आपल्याला समाज ख?्या धर्माच्या पालनाकडे वळवायचा आहे.  याची त्यांना स्पष्ट कल्पना होती.  
मायबापाहून बहु मायावंत, करू घातपात शत्रूहूनीह्ण किंवा ह्यभले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळीचे माथी काठी हाणूह्ण ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका असे नुसती प्रवचने करणे सोपे आहे. ते ऐकताना फार छान वाटते, परंतु करिता हे दु:ख थोर आहे  अशी जाणीव ते देतात. नुसत्या शब्दज्ञानाचाते निषेध करतात. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने असे त्यांचे स्पष्ट प्रतिपादन असे आपला उपदेश हा कृतीत परिवर्तित झाला पाहिजे म्हणून ते म्हणतात की जाळावी हे थोरी लाभावीण ब्रम्हज्ञान मोलाचे आहे हे खरे, पण ह्यमानताहे कोण, तुझे कोरडे शब्दज्ञान त्याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव आला पाहिजे. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार अर्थेविण पाठांतर कासया करावे,  व्यर्थचि मरावे घोकुनिया असेही ते सांगतात.  अशी भुसाची कांडणी करून काय हाती लागणार ? असा प्रश्न ते करतात. तुकोबांचा भर बोले तैसा चाले यावर होता.  

Web Title: Why Sant Tukaram Maharaj Is One Of the Greatest Sant In Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.