। संतांचिया गावी... ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:23 AM2018-07-22T00:23:27+5:302018-07-22T00:23:50+5:30

 . Santachia Gaugui .... | । संतांचिया गावी... ।

। संतांचिया गावी... ।

Next

-इंद्रजित देशमुख

‘आता जावे पंढरीशी।
दंडवत विठोबाशी।।’
असा अतिअगत्यदर्शी सात्त्विक भाव उरात धरून माउली आणि जगद्गुरू या दोन्ही संत महात्म्यांच्या पालखी सोहळ्यांनी वाखरीत विसावा घेतलाय. आज दिवसभर इथं थांबून संध्याकाळी हे दोन्ही सोहळे पंढरपुरात जाणार आहेत आणि हा वारकऱ्यांच्या प्रेमाने ओथंबलेला समुद्र त्या पंढरीश परमात्म्याच्या कृपासागरात मिसळणार आहे.
‘देव आणि भक्त दुजा नाही विचार’ याचं प्रत्यंतर आम्हाला आज या संतांच्या गावात अनुभवायला मिळणार आहे. अंत:करणाला ओतप्रोत संपन्नता बहाल करणाºया संतांच्या गावाचं वर्णन माझे तुकोबाराय खूप छान शब्दांत करतात आणि म्हणतात,
‘संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळ।
नाही तळमळ दुखलेश।।
तेथे मी राहीन होऊनि याचक।
घालतील भीक तेचि मज।।
संतांचिया गावी असे भांडवल।
अवघा विठ्ठल धन वित्त।।
संतांचिया गावी उपदेशाची पेठ।
प्रेम सुख साट देती घेती।।
तुका म्हणे तेथे आणिक नाही परी।
म्हणुनी भिकारी झालो त्यांचा।।
संतांनी निर्माण केलेल्या या गावात प्रेमाचाच सुकाळ आहे. दु:खाचा लेशही नाही असं तुकोबारायांचं मत आहे. कारण दु:खाची निर्मिती ही भेदातून होत आहे. संतांच्या गावात भेदच असत नाहीत मग दु:ख असेलच कसे.
मुळात संतांचे खूप विलक्षण असणारे चार गुण आहेत. ते म्हणजे मित्रता, करुणा, शांतता आणि आचरण. संत सर्वजिव्य मित्रता धारण करतात. विश्वातील प्रत्येक जिवाशी त्यांनी मित्रता धारण केलेली असते. ‘कोण्याही जिवाचा न घडो मत्सर’ हे त्या सर्वेश्वर परमात्म्याच्या पूजेचे वर्म त्यांनी अंतयार्मी जपलेले असते. म्हणूनच सर्व जिवाशी ते मित्रतेने वागतात. माझ्या तुकोबारायांनी आपल्याला पाहून बुजून उडून गेलेली पाखरं पाहिली आणि अंतर्मुख होऊन स्वत:ची साधना वाढवली. माझ्या नाथांनी काशीहून आणलेली पाण्याची कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखात ओतली. माझे नामदेवराय तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या पाठीमागून धावले. ही सगळी त्या मित्रतेच्या गुणांची वस्तुनीती दाखवून देणारी उदाहरणे आहेत.
जणी वणी अवघा देव।
या अनुवृत्तीत ते जगत असतात.
संतांच्या करूणेबद्दल काय बोलावं, त्यांच्या हृदयात सदैव आणि सर्वांसाठीच कारुण्यभाव ओथंबलेला असतो. म्हणून तर ज्या जगाने दगड मारले, झोळीत शेण घातलं त्याच जगासाठी माझी माउली पसायदान मागते. याच जगावर आनंदाचे आवारू मांडण्याची प्रतिज्ञा करते आहे.
संतांच्या अंगी आणखीन एक महत्त्वाचा आणि विलक्षण गुण असतो आणि तो म्हणजे शांतता. संत कायमच संतुलित वृत्तीने जगत असतात. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या जीवनात ज्या परमशांतीचा अनुनय केलेला असतो त्यापासून ते कधीच परावृत्त होत नाहीत आणि म्हणूनच माझ्या गोरोबाकाकांनी स्वत:च्या पायाखाली तुडवलं तरी कबिरांनी स्वत:चं मुल संतांचिया पायी खर्च केलं तरी ते शांत होते.
‘सुखी संतोशा न यावे।
दु:खी विशादा न भजावे’।
असं ते जगत असतात.
संतांच्या अंगचा सगळ्यात महत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे आचरण होय. आचरणाच्या बाबतीत ते अगोदर वागतात आणि मग सांगतात 'बोले तैसा चाले’ हे समृद्ध विचार तुकयांच्यासाठीच असतं. उक्ती आणि कृती यात अगदी तसूभरही फरक ते ठेवत नाहीत.
या आणि अशा अनंत गुणांनी मंडित असलेलं जगणं संतांनी अंगिकारलेलं असतं म्हणूनच तिथे प्रेमाचा सुकाळ असतो. अशांच्या दारात याचक होऊन रहावं आणि आपली सर्व अंगांनी अपूर्ण असणारी झोळी भरून घ्यावी. कारण जिथे विठ्ठल नामच धन व वित्त म्हणून कार्यरत असतं. उपदेशाची अगदी पेठच असते आणि त्यात प्रेम व सुख भरलेलं असतं. त्यांच्याइतकं तुलनेत दुसरं कुठंच आणि काहीच मिळत नाही म्हणून महाराज म्हणतात की, 'मी इथे भिकारी का झालो त्याचं कारण याचकाला पूर्णांशाने तृप्त करणारं एकमेव गाव म्हणजे हे संतांचं गाव होय’. आज या गावात हे सगळे संतजन आलेत, त्याच्या वर्णनासाठी महाराज म्हणतात,
या सगळ्याच संतांच्या मांदियाळीत रमून आम्ही आमच्यातील आमचंपण हरवून त्यांच्यासारखंच बनावं आणि ही ज्ञानोबा-तुकोबांची वारी आमच्या आत उतरावी, अशी याचना करत म्हणावसं वाटतंय
‘गोमटेसे करा माझे।
भार ओझे तुम्हांसी।।’
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title:  . Santachia Gaugui ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.