भक्तीला ज्ञानाची जोड हवीच! मुक्ताईची डोळस भक्ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 10:49 AM2017-08-16T10:49:11+5:302017-08-17T11:34:48+5:30

स्त्री जीवनातील चैतन्य नि निर्माणशीलता अखंड अग्निपरीक्षा देत राहूनही युगानुयुगं बोलत असते. कधी ज्ञानियाचा राजा संत ज्ञानदेव यांची धाकुली बहीण ‘मुक्ताबाई’ होऊन बोलू लागते.

Devotee should have knowledge of knowledge! Muktai's dull favors ... | भक्तीला ज्ञानाची जोड हवीच! मुक्ताईची डोळस भक्ती...

भक्तीला ज्ञानाची जोड हवीच! मुक्ताईची डोळस भक्ती...

Next
ठळक मुद्देआपल्या ज्ञानदादाला लाघवी मुक्ताई अंतरीच्या उमाळ्यानं समजावते, कळत, नकळत तत्त्वज्ञानाचं बोधामृतही अगदी आईच्या मायेनं पाजते. संत नामदेव मात्र त्यांच्या दृष्टीनं ‘कच्च मडकं’ ठरल्यावर मुक्ताईनं त्यांना गुरुमार्ग दाखवला! तोही त्यांच्या कल्याणासाठीच.निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे सद्गुरू असले तरी आदिशक्ती मुक्ताई ही त्यांची ‘प्रेरणाशक्ती’ आहे.

- डॉ. कुमुद गोसावी

आज संगणक युगातही नित्य नूतन समस्या जनचळवळीचे केंद्र बनतात, ज्यात आशिया खंडात एक अब्जाहून अधिक महिलांची कमतरता आहे, अशी ‘युनो’चं सर्वेक्षण सांगणारी समस्याही असते. त्यादृष्टीनं स्त्री श्क्तीच्या ऊर्जा स्रोताचा मूळ वेध घेणंही लक्षणीय ठरतं. अगदी १३ व्या शतकातील स्त्री संत कवयित्री ‘जनाबाई’ 
‘स्त्री जन्म म्हणुनी । न व्हावे उदास।।’ असा आत्मनिर्भर अभंग बोलातून जी अक्षर साक्ष देते ती खूप काही सांगून जाते. शब्दांना स्वत:चं अंगभूत संगीत असतं. अक्षरांना लय असते. लिपिला इतिहास नि वर्तमान असतो. तसंच स्त्री जीवनाचं आहे. तिच्यातील चैतन्य नि निर्माणशीलता अखंड अग्निपरीक्षा देत राहूनही युगानुयुगं बोलत असते. कधी ज्ञानियाचा राजा संत ज्ञानदेव यांची धाकुली बहीण ‘मुक्ताबाई’ होऊन बोलू लागते. 
योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा।
विश्वरागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी।
शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।
विश्व पट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
स्वकालीन धर्मांधजनांच्या छळाचा कहर होऊन साक्षात ज्ञानेश्वरांचं संवेदनशील कविमन जेव्हा विचलित होतं, नि ते ध्यानगुंफेत जाऊन आतून ताटी लावून घेतात! त्यावेळी मुक्ताईनं आळवलेले तिचे स्वरचित ‘ताटीचे अभंग’’ म्हणजे अध्यात्म वाटेवरील दीपस्तंभच होत! तिच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्कारी, आत्मविष्काराच्या अत्युच्च पातळीवरील सिद्धवाणीतील पूर्णोद्गारच. पैठणपासूननजीक असलेल्या आपेगावचे त्र्यंबकपंत कुलकर्णी हे मुक्ताईचे पणजोबा नि गोविंदपंत आजोबा हे नाथपंथाचे अनुयायी नि कृष्णभक्तही. वडील विठ्ठलपंत हे अतिशय बुद्धिवान; परंतु विरक्त. मुक्ताईची आई रुख्मिणी, अत्यंत कष्टाळू, श्रद्धाळू पतिव्रता, जेव्हा विठ्ठलपंत संन्यास घेतात तेव्हा आपल्या ईश्वरी सेवाभावामुळेच तिनं पतीला पुन्हा गृहस्थाश्रमात आणलं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार तेजस्वी अपत्यांना जन्म दिला; मात्र संन्याशाची मुलं म्हणून त्यांना ब्रह्मवृंदाच्या आज्ञेनं देहान्त प्रायश्चित्त घेतल्यानं तरी उजळमाथ्यानं जगता यावं म्हणून या माता-पित्यानं मृत्यूलाही कवेत घेतलं! त्यावेळीच चिमुकल्या मुक्ताईला बालपण विसरून ‘आई’ व्हावं लागलं. म्हणून तर ती परखडपणे म्हणते, चिंता क्रोध मागे सारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
आपल्या ज्ञानदादाला लाघवी मुक्ताई अंतरीच्या उमाळ्यानं समजावते, कळत, नकळत तत्त्वज्ञानाचं बोधामृतही अगदी आईच्या मायेनं पाजते. खरं तर कुणी कुणावर रागावायचं? सारं अंती एकच! आपलीच जीभ नि आपलेच ओठ! अल्पकाळ का असेना स्वस्वरूपापासून दुरावलेल्या ज्ञानदादाला मुक्ताईनं मुक्तपणे विनवलं. 
सुखसागर आपण व्हावे। जग बोधे तोषवावे।।
असं आपल्या अलौकिक सामर्थ्यशाली दादाला विश्वात्मक कल्याणाचं कार्य करायचं आहे याचं स्मरण करून देणारी मुक्ताई मात्र त्या अर्थानं किती स्मरली जाते? हा प्रश्नच आहे. ‘तुम्ही तरुण विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा।’ असा तिचा लडिवाळ हट्ट तिच्या ज्ञानदादांनी पुरवला. ताटीबरोबर त्यांनी आपल्या मनाचं दारही उघडलं. अवघ्या विश्वाला पुढं ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपानं अत्यंत मौलिक असा अक्षय ‘ज्ञानठेवा’ दिला. मुक्ताईचे हे ताटीचे अभंग- वात्सल्याचे झरे जागीच झुळुझुळू झिरपत राहिले! नाही का? ‘हरिपाठा’चे तिचे अभंगही अत्यंत प्रासादिक नि भक्तिभावपूर्ण आहेत. संत एकनाथ महाराजांनी, ‘मुक्तपणे मुक्त अशी योगियांची विश्रांती’ असं मुक्ताईच्या महानतेचं मार्मिक वर्णन केलं आहे. ती बुद्धिमान, विरागी नि संतत्ववृत्तीची होती. बालवयातच आई-वडिलांच्या प्रेमाला पारखी झाल्यानं प्रतिकूल परिस्थितीचे तीव्र चटके सोसावे लागल्यानं ती अकालीच प्रौढ झाली होती. विजेची चमक तिच्या बुद्धिमत्तेत होती... त्यासोबत तिच्यातील फटकळपणा, हजरजबाबीपणा तिच्या तल्लख बुद्धीला शोभून दिसत होता. 
संत नामदेव व मुक्ताई 
संत नामदेवरायांनी संतमेळ्यात आलेल्या ज्ञानदेवादि भावंडांना अहंभावानं नमस्कार करण्याचं टाळताच तिनं सडेतोडपणानं त्यांना विचारलं, अखंड जयाला देवाचा शेजार। काय अहंकार गेला नाही। मान अभिमान वाढविशी हेवा। दिस असता दिवा हाती घेसी। परब्रह्मासंगे नित्य सुधाखेळ।आंधळ्याचे डोहाळे का बा झाले। कल्पतरू तळवटी इच्छिल्या त्या गोष्टी । अद्यापि नरोटी राहिली का?।।
‘आपण देवाचे अत्यंत लाडके भक्त आहोत!’ याचा संत नामदेवांना अभिमान वाटत होता. हे चाणाक्ष मुक्ताईनं अचूक हेरलं नि निवृत्तीसह आपल्या तिन्ही वडीलबंधूंनी संत नामदेवांना विनम्रभावानं नमस्कार केला असताना मुक्ताईन मात्र तो अव्हेरण्यातही तिचा उदात्त हेतू होता. नामदेवांसारख्या विठ्ठलाच्या परमभक्तानं अहंरहित राहून गुरुकृपाछायेत यायलाच हवं, तरच त्यांच्या भक्तिभावाचं सर्वार्थानं सोनं होईल या आंतरिक जिव्हाळ्यानंच तिनं संत गोरोबाकाकांकडून संत नामदेवांची परीक्षा घ्यायला लावली!
संत गोरा कुंभारांनी जमलेल्या सर्व संत मंडळीतील प्रत्येकाच्या डोक्यावर आपल्या थोपटणीनं मारून त्यांची परीक्षा घेतली. त्यावेळी संत नामदेव मात्र त्यांच्या दृष्टीनं ‘कच्च मडकं’ ठरल्यावर मुक्ताईनं त्यांना गुरुमार्ग दाखवला! तोही त्यांच्या कल्याणासाठीच. ‘गुरूकडून ज्ञान मिळवायला हवं!’ असं तिनं नामदेवांना म्हटलं, 
गुरुविण तुज नळे चिगा मोक्ष।
होशील मुमूक्षू साधक तू।।
‘भक्तीला ज्ञानाची जोड हवीच!’ अशी मुक्ताईची डोळस भक्ती भूमिका होती. नामदेवांची अहंता गेल्याशिवाय त्यांची आध्यात्मिक प्रगती होणार नाही! याची जाण असल्यानं तिनं नामदेवांना विसोबा खेचर यांच्याकडं त्याचं’ गुरुत्व लाभावं म्हणून पाठवलं. प्रारंभी नामदेवांना मुक्ताईचं हे वागणं वर्मी झोबलं.!
लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी।
केले देशोधडी महान संत।
सगळेचि काखेसी येई ब्रह्मांड।
नामा म्हणे पाखंड दिसे मज।।
संत नामदेवांच्या या विरोधी सुरातही मुक्ताईचं मोठेपणच सामावलं आहे. साक्षात पांडुरंगानं मुक्ताईचं वागणं योग्य असल्याची साक्ष लाभल्यावर मात्र त्यांच्या मनात मुक्ताईसंबंधी विशेष आदरभाव जागृत झाल्याची ग्वाही त्यांचे कितीतरी अभंग देऊन जातात. मी पण मावळून भक्तराज नामदेव ‘ज्ञानीभक्त’ बनविण्याची किमया मुक्ताबार्इंची आहे. हे वास्तव ध्यानी घ्यायला हवं. एवढंच नव्हे, तर निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे सद्गुरू असले तरी आदिशक्ती मुक्ताई ही त्यांची ‘प्रेरणाशक्ती’ आहे. तिनं ताटीच्या अभंगांतून आपणच बंद केलेला मनाचा दरवाजा आपणच कसा उघडायचा? हेही मोठ्या युक्तीनं सांगितलं. एका अथांग तत्त्वज्ञानाची ओळख अवघ्या विश्वाला अंतरीच्या ओलाव्यानं अक्षररूपानं करून दिली! मुक्ताईविषयीचा पराकोटीचा प्रेमादरभाव ज्ञानदेवांनी आरतीरचनेतून व्यक्त केला आहे तो तिचा अधिकार तिचं संतकुळीतील स्थान सांगण्यास पुरेसा आहे. अहो मुक्ताबाई तू ब्रह्मीचे अंजन। तुझेचि प्रसादे सद्गुरू निधान।
तूज आणि निवृत्ती नाही भिन्नता। तोचि तू आरती सास्ना माता।
मुक्ताई मुक्तकृपा हे परब्रह्मीची माया। जे अव्यक्त रूप तू पाहे चांगया। ज्ञानराज ओवाळी अहो मुक्ताबाई।
चांगदेवास मुक्ताईचा अनुग्रह : मुक्ताईनं ताटीच्या अभंगातून जसा ‘संतत्वाचा’ पहिला स्वर उमटवला तसा ‘योगी पावन मनाचा’ याचं स्मरण देत योगिक संस्काराचाही उच्चार केला! विश्व वन्ही म्हणजे अग्नी झालं असेल तर आपण ‘पाणीरूपानं’ विश्व शांत करावं! असा शांतीचा महामंत्र देणाऱ्या मुक्ताईच्या अभंगवाणीत आत्मानंदाचे कल्लोळ आहेत! म्हणून तर मुक्ताई मुळात अमृतसंजीवनी आहे.
मुक्तपणे मुक्त । श्रेष्ठपणे श्रेष्ठ ।
सर्वांना वरिष्ठ । मुक्ताबाई ।।
मुक्ताईचं हे श्रेष्ठत्व सर्वमान्य असूनही हे ‘मूर्तिमंत मातृत्व’ किती संतप्रेमींच्या अंतरी रुजलं? अनुसरलं गेलं? त्यावर भरभरून लिहिलं गेलं? कितींनी आस्वादलं? मुक्ताईभक्त बाबूरावजी मेहुणकर, स्व. विजया संगवई, मुक्ताबार्इंच्या जीवनावरील ‘अमृतसंजीवनी’ कादंबरी लिहिणाऱ्या अनुराधा फाटक आदी मान्यवर तसे मर्यादित संख्येत का होईना लाभावेत हे सद्भाग्यच म्हणायला हवं. तसं तर ॐकारातील ‘अं’‘उ’ व ‘म’ या तीन अक्षरांतून सर्व मातृका निघाल्या आहेत. त्यातून सप्तस्वर निर्माण झाले. गायत्री, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची उपासना म्हणजे स्त्रीशक्तिपूजनाचंच प्रतीक आहे. ‘देवी भागवता’सारख्या महर्षी व्यासरचित पुराणग्रंथानंही स्त्रीशक्तीच आदिशक्ती, सृष्टीनिर्माती असल्याचं वर्णिलं आहे. पतीला पापकृत्यापासून वाचवणारी पत्नी विद्येप्रमाणे प्रयत्नपूर्वक जपायला हवी, अशी अपेक्षा ‘स्कंधपुराणात’ही व्यक्त केली गेली आहे. ‘सौभाग्यशयनव्रतम्’ हे पार्वतीची भक्तिपूजा करणारं व्रत पुरुषांनी दरमहा तृतीयेला वसंत ऋतूत सुरू करावं! सर्व इच्छा पूर्ण करणारं हे व्रत वरुणानं नि ‘कार्तवीर्यानं’ केल्याचं ‘कर्मपुराणा’त म्हटलं आहे. धार्मिक, सामाजिक विकासाचं हे प्रतिबिंबच नव्हे काय? ‘ब्रह्मवैवर्त’ पुराणातील प्रकृती खंडातील ‘सावित्रीपूजन’, ‘दुर्गापूजन’ आदींचं विवेचनही स्त्रीशक्तिमहिमा दर्शवून जातं!
वेद, पुराणकालीन स्त्रियांप्रमाणे मध्ययुगीन ‘मुक्ताई, जनाबाई, सोयराबाई, महदंबा, गोणाई, राजाई, सोसूबाई, नागरीबाई, वेणाबाई, बहेणाबाई आदी स्त्री संत-साध्वी स्त्रियांनी केलेल्या कालानुरूप क्रान्तदर्षी कार्याचा केवळ आठवदेखील आजही प्रेरणादायी, दिशादर्शक असाच असल्यानं त्याचा वेध घेण्याचा हा प्रपंच! जो केवळ लेखरूपानंच नव्हे तर प्रबंधरूपानं, विश्वसंवादी प्रभावी माध्यमांद्वारे अखंड चालू राहायला हवा. ज्यातून चांगदेवासारखा महान योगी जर मुक्ताईच्या अनुग्रहानं आयुष्याचं सोनं करतो, तर सर्वसामान्यांना त्या चिंतनातून चैतन्यऊर्जा का नाही लाभणार?
मठायोगी चांगदेव नि मुक्ताई यांच्यातील वीण गुरु-शिष्य, माता-बालक, करवली-नवरदेव आदी नात्यांनी गुंफली गेली आहे. त्यातील भावबंध उलगडून बघण्यातील अभंगसाक्षही विलक्षण बोलकी आहे. चौदाशे वर्षे वयाचे चांगदेव चौदा विद्या नि चौसष्ट कला-पारंगत होते. मुक्ताईचं शिष्यत्व स्वीकारण्याआधीची आपली अवस्था चांगदेव वर्णन करतात,
चवदाशे वर्षे शरीर केले जतन । नाही अज्ञानपण गेले माझे ।
अहंकारे माझे बुडविले घर । झालो सेवाचोर स्वामीसंगे ।।
तापत्रयी तापलो महाअग्नी जळालो । अविवेकी झालो मंदमती।
अशा अवस्थेतील चांगदेव आपलं योगवैभव दाखवण्यासाठी अलंकापुरीत आल्यावर मुक्ताईनं त्यांचं गर्वहरण केलं. त्याला दैतातून अद्वैतात आणलं । तेही दहा वर्षीय मुक्ताईनं चौदाशे वर्षांच्या चांगदेवाची गुरुमाऊली होऊन !
गुणातीत डहाळी पाळणा लाविला ।
तेथ सुत पहुडला मुक्ताईचा ।।
असा पाळणा गात मुक्ताई माऊलीनं आपल्या चांगदेव सुताला जोजावलं आहे. त्यांच्यातील हा सख्यभाव भावतो. चांगदेव लेकरू आपल्या आईची पाद्यपूजा करतो. आपली शिष्याची भूमिका चांगदेव कायम स्मरणात ठेवतो. आपल्या जन्मांतरीचं मूळ मुक्ताईनंच फेडलं असल्याचं अभिमानानं सांगतो,
चांगयाचे वऱ्हाड मुक्ताईने केले।
मूळ जे फेडिले जन्मांतरीचे ।।
चौदा शत जाली बुद्धि माझी गेली ।
सोय दाखविली मुक्ताईने ।।
आपण आदिशक्ती मुक्ताईचे पुत्र आहोत ! परमशिष्य आहोत ! याचा चांगदेवांनी असा सार्थ अभिमान अनेकवार व्यक्त केलेला दिसून येतो.
मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कला ।
नित्य मुक्त लीला दावी अंगी ।
चित्कला मुक्ताई महिमाही नानारूपानं आस्वादता येतो. त्यात शांतीरूपी नवरी नि चांगदेव हा नवरा या लग्नात मुक्ताई चक्क करवली म्हणून मिरवतात !
पर्णिली शांती बैसली पाटी ।
मुक्ताई करवली हळदुली वाटी ।।
यावरून हटयोगी, वयोवृद्ध, ज्ञाननिष्ट, चांगदेवांना आत्मज्ञान देणारी त्यांचं संपूर्ण वर्तन-परिवर्तन करणारी मुक्ताई कशी जगावेगळी आहे! हेही सिद्ध होते !

Web Title: Devotee should have knowledge of knowledge! Muktai's dull favors ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.