झाली बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:47 AM2018-07-04T05:47:25+5:302018-07-04T05:47:25+5:30

कोकणातील/ गोव्यातील गणपती दीड-तीन-पाच-सात जसा मानून घेतलाय त्याप्रमाणे पूजला जातो. घराजवळच्या तळीवर विसर्जन होते.

 Bolted out | झाली बोळवण

झाली बोळवण

Next

- डॉ. गोविंद काळे

गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
या आबालवृद्धांच्या घोषणेने घाटावरची अनंत चतुर्दशी दुमदुमून जाते. कोकणातील/ गोव्यातील गणपती दीड-तीन-पाच-सात जसा मानून घेतलाय त्याप्रमाणे पूजला जातो. घराजवळच्या तळीवर विसर्जन होते. तळीवर जायचे तर वाट खाचखळग्याची, हातात विजेरी हवी आणि मुखी शब्द असतात ‘मार्गे हळूहळू चाला, मुखाने श्रीगजानन बोला’ असे म्हणत म्हणत गणेश विसर्जनासाठी वाड्यावरील मंडळी निघतात. गणेशाचे आगमन आणि बोळवण सर्वत्र अतीव उत्साहानेच होते. ‘बोळवण’ हा शब्द अनंत चतुर्दशीनंतर भेटतच नाही. तो दैनंदिन व्यवहारातून वर्षभरासाठी जणू हद्दपार झालेला असतो. बोळवण म्हणजे रवानगी, पाठवणी, विसर्जन.
संसारातही केव्हा केव्हा बोळवण करण्याची पाळी येते. एखादा दूरस्थ पाहुणा मुक्कामाला येतो, परत जाण्याचे नाव घेत नाही. घरात कुजबूज सुरू होते की, आणखी किती दिवस राहणार? आम्ही तातडीच्या कामासाठी परगावी जाणार आहोत, असा सूर गृहलक्ष्मी लावते. पाहुण्याला जाणीव होते. तो आपला गाशा गुंडाळतो. घरातील सगळेच सुस्कारा सोडतात. शेजारचे नाना खोचकपणे विचारतात, पाहुणे गेले वाटते? बाबुराव उत्तरतात, शेवटी बोळवण करावी लागली. म्हणजे गोडीगुलाबीने, मोठ्या प्रेमाने रवानगी केली. येतात असे प्रसंग आयुष्यात.
घरी आलेल्या पाहुण्यांची बोळवण करता येते. मंगलमूर्तीची बोळवण मोठ्या थाटामाटाने केली जाते. ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’ हे आपले उगी उगी. ही सारी व्यावाहरिक गणिते. संत म्हणतात ‘बोळवण’ मी तू पणाची झाली पाहिजे.
‘मी तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान’
असे ध्यान लागते का? द्वैताची बोळवण झाली पाहिजे. अहंकाराची बोळवण केली पाहिजे. ही बोळवण आरतीमध्ये सुरेख म्हणता येते. प्रत्यक्षात काय? गणित अवघड आहे. अशी गणिते सुटता सुटत नाहीत. ‘हरपले मन, झाले उन्मन’ मनरहित अवस्थेत जगता येणे शक्य होईल का? आहे ना अध्यात्म अवघड? जे अवघड आहे ते आपणच सोपे करायचे असते. त्याला शॉर्टकट नाही. तुकोबांच्या भाषेत सांगायचे तर
।। कागदी लिहिली नावाची साखर, चाटिता मधुर केवी लागे।।
भगवान श्री रमण महर्षींच्याकडे दर्शनासाठी आलेल्या पाश्चात्य विद्वान भक्ताने ‘माझे मन ध्यानात न लागता सदैव भटकत राहते’ असा प्रश्न केला तेव्हा महर्षी उत्तरले, जीवनातील नानात्व हे निश्चय करायला देत नाही. हे सरळ आहे. म्हणून अवघडही आहे. मी तू पणाची बोळवण हाच उतारा त्यावर आहे.

Web Title:  Bolted out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.