पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 05:00 AM2021-10-18T05:00:00+5:302021-10-18T05:00:51+5:30
असेच वातावरण राहिले तर, धान कापणी लांबत राहणार असून लोंबातील धान झडून उत्पादनावर परिणाम होणार आहे. मागील आठवड्यापासून तालुक्यात शेतकऱ्यांनी धान कापणीस सुरूवात केली आहे. मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापणी थांबवली. त्यातच शनिवारी व रविवारी काही काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धान, सोयाबीन, कापूस उत्पादनकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
नागभीड तालुक्यात धान मोठ्या प्रमाणावर कापणीस आला आहे. अशातच ढगाळ वातावरण शनिवारी व रविवारी काही प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असेच वातावरण राहिले तर, धान कापणी लांबत राहणार असून लोंबातील धान झडून उत्पादनावर परिणाम होणार आहे.
मागील आठवड्यापासून तालुक्यात शेतकऱ्यांनी धान कापणीस सुरूवात केली आहे. मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापणी थांबवली. त्यातच शनिवारी व रविवारी काही काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धान कापणी लांबणार आहे. धान कापणी अशीच लांबत राहिली तर, उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कापणीस आलेले धानाचे लोंब पूर्णतः पक्व झालेले आहेत. हलक्या हवेने आणि काही ठिकाणी पडत असलेल्या पावसाने लोंबातील धान झडून त्याच्या उत्पन्नावर परिणामाची शक्यता आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी ठोकळ धानाची लागवड केली. मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या धानाला मोठा फटका बसणार आहे.
वाघाचा शेतात दबा, शेतकरी भयभीत
नागभीड जवळच्या शेतशिवारात एक वाघ पिल्लांसह दबा धरून आहे. परिणामी शेतकरी चांगलेच भयभीत झाले असून शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. नागभीड लगतच सुलेझरी आणि खैरीचक पारखीचा शेतशिवार आहे. या शेतशिवारात धानाची लागवड करण्यात आली असून सध्या धान कापणीला आहे. याशिवाय समाधानकारक पाऊस पडल्याने काही शेतकरी लाखोळीची टाकणीही करीत आहेत. हा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांचे शेतावर नियमित जाणे येणे असते. असेच नियमित जाणे येणे असणाऱ्या काही शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतावर जाणेच बंद केले आहे. आता धान कापणीला येत असल्याने धानाची कापणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.