निवासस्थाने ओस
By Admin | Published: August 3, 2014 11:59 PM2014-08-03T23:59:46+5:302014-08-04T00:47:53+5:30
अतुल शहाणे, पूर्णा पंचायत समिती परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले निवासस्थाने ओस पडले आहेत़ या निवासस्थानांमध्ये एकही कर्मचारी वास्तव्यास नाही़ परिणामी शासनाचा उद्देश असफल ठरला आहे़
अतुल शहाणे, पूर्णा
पंचायत समिती परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले निवासस्थाने ओस पडले आहेत़ या निवासस्थानांमध्ये एकही कर्मचारी वास्तव्यास नाही़ परिणामी शासनाचा उद्देश असफल ठरला आहे़
शासकीय कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर बदली होते़ अशा वेळी या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे असे शासनाचे बंधन आहे़ मुख्यालयी राहण्यासाठी कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने शासकीय निवासस्थाने बांधली जातात़ परंतु, कर्मचारी या निवासस्थानात न राहता जिल्ह्याच्या ठिकाणाहून अथवा त्यांच्या सोयीच्या ठिकाणाहून ये-जा करतात़ त्यामुळे ही निवासस्थाने ओस पडलेली असतात़
पूर्णा तालुक्याच्या निर्मितीनंतर पंचायत समिती अस्तित्वात आली़ सुरुवातीचे काही वर्षे तात्पुरत्या इमारतीत या कार्यालयाचे कामकाज चालले़ त्यानंतर पूर्णा- ताडकळस या मार्गावरील नवीन इमारतीमध्ये हे कार्यालये स्थलांतरित झाले़ या कार्यालयाच्या परिसरातच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १५ निवासस्थाने बांधण्यात आली़ तसेच सभापती, गटविकास अधिकारी यांच्यासाठी दोन सुसज्ज निवासस्थानेही उभारली़ परंतु, सध्याच्या स्थितीला या निवासस्थानांमध्ये एकही कर्मचारी वास्तव्यास नाही़ त्यामुळे निवासस्थानांची पडझड होत आहे़
परभणी, नांदेड या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन सुरू असते़ परिणामी शासकीय कार्यालय देखील रेल्वेच्या वेळेनुसारच चालते़ याचा त्रास नागरिक आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागतो़ कर्मचारी कार्यालयात वेळेवर भेट नसल्याने कामे रखडली जातात. एकाच कामासाठी चकरा माराव्या लागतात.
कोट्यवधींंचा खर्च करून उभारलेली निवासस्थाने आजमितीला मात्र ओस पडलेली आहेत़ त्यामुळे शासनाचा हा खर्च वाया जात आहे़
निवासस्थानांची पडझड
१५ वर्षांपूर्वी ही निवासस्थाने बांधली आहेत़ परंतु, या संपूर्ण काळात या ठिकाणी कर्मचारी वास्तव्यास आले नाहीत़ त्यामुळे निवासस्थानांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे़ स्वच्छता नसल्याने सर्वत्र घाण पसरली आहे़ झाडे वाढली आहेत़ खिडक्या आणि दरवाज्यांची मोडतोड झाली आहे़ या निवासस्थानांचा सुयोग्य वापर होण्यासाठी आता पंचायत समितीलाच पावले उचलणे गरजेचे झाले आहे़
निवासस्थानांमध्ये सुविधांचा अभाव
शहरापासून दूर अंतरावर ही निवासस्थाने बांधली आहेत़ त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या ठिकाणी राहताना असुरक्षिततेची भावना निर्माण होते़ तसेच पाणी, स्वच्छता, वीज यासारख्या सुविधांचा अभाव असल्याचे सांगितले जाते़ परंतु, असे असले तरी या सुविधा उपलब्ध करून कर्मचाऱ्यांनी निवासस्थानांमध्ये राहणे गरजेचे आहे़